परभणी : पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकास, उत्कर्ष, न्याय व हक्कांसाठी अनेक वर्षांपासून विविध स्वरूपाची आंदोलने, उपोषणे, निवेदने तसेच राज्य सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.
समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, राज्यातील सर्व पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या सर्व वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती देणे, युट्यूब व पोर्टल माध्यमांना शासकीय मान्यता, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांसाठी विमा व आरोग्य योजना, अधिस्वीकृती पत्रिकेतील जाचक अटी रद्द करणे, पत्रकारांच्या वाहनांना टोलमधून सूट देणे तसेच पत्रकारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करणे यांचा समावेश आहे.
खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या प्रकरणांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी, तसेच पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या व मारहाणीच्या घटनांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठीही पत्रकार सुरक्षा समिती प्रभावीपणे काम करत आहे.
या सर्व प्रश्नांबाबत पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार लवकरच परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेणार आहेत, अशी माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष प्रसाद पौळ यांनी दिली.






