परभणी / प्रतिनिधी
पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ताडकळस पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. जयंती उत्सव शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने व सामाजिक सलोखा राखत साजरा व्हावा, यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत मिरवणुकीचे मार्ग, वेळापत्रक, वाहतूक व्यवस्था, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कोणतीही अफवा पसरू न देणे, वाद टाळणे आणि सर्व समाजघटकांनी परस्पर सहकार्य करणे, यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत व डीजे-मुक्त वातावरणात साजरी झाली पाहिजे,” असे आवाहन केले. तसेच ध्वनीप्रदूषण टाळावे, नियमांचे पालन करावे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीस पोलीस पाटील, पत्रकार बांधव तसेच ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयंती मंडळाचे विविध गावांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बैठकीत ताडकळस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश तावडे, राहुल वडमारे, व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश:
शिक्षण, समता, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित समाज उभारण्याचा संदेश देत, जयंती उत्सव त्यांच्या विचारांनुसार साजरा करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.






