परभणी, दि. 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त परभणी शहरात अभिमान, आदर आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात सकाळी अभिवादनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील, महापौर सय्यद इकबाल, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण उपमहापौर गणेश देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉ. एम. एस. भरणे, सचिव बाबासाहेब धबाले, उपआयुक्त बबन तडवी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसिलदार संदीप राजापुरे, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त राजू एडके यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच समता सैनिक दलामार्फत मानवंदना देण्यात आली. बौद्ध भिक्खू यांच्या उपस्थितीत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पंचशील ध्वज रोहन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विचारांचा जागर करत समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन करण्यात आले.
आपल्या भाषणात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या आदर्शांवर चालत सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल.” तसेच “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा त्यांचा मूलमंत्र आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण परिसर ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. या जयंती सोहळ्याच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक समतेचा संदेश अधिक बळकट करण्यात आला.






