ताडकळस प्रतिनिधी :
पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर साजऱ्या होणाऱ्या ईद-उल-फितर निमित्त ईदगाह येथे सकाळी ठीक ९ वाजता नमाज-ए-ईदुल-फितर शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. महिनाभर उपवास, संयम, नमाज आणि इबादतीनंतर मुस्लिम बांधवांनी अल्लाहप्रती कृतज्ञता व्यक्त करत ईदची विशेष नमाज अदा केली.
ईद-उल-फितर हा सण बंधुता, प्रेम, शांतता आणि दानधर्माचा संदेश देणारा असून समाजात ऐक्य आणि सौहार्द टिकवण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. नमाजपूर्वी फितरा देण्याची परंपरा पाळत गरजू बांधवांना मदतीचा हात देण्याचा संदेश देण्यात आला.
ताडकळस येथील जामा मस्जिदचे शाही इमाम कांजी हाफिज मसूद यांनी देशात सामाजिक एकता, शांतता व बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष दुआ केली. तसेच भारत देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या सैनिकांच्या सुरक्षिततेसाठीही प्रार्थना करण्यात आली.
या नमाज पठण प्रसंगी सभापती बालाजी रूद्रवार, माजी सभापती रंगनाथ भोसले, ग्रामसेवक बी. जी. पांचपुजे, जि. प. सदस्य संजय जल्हारे, मनु पाटील आंबोरे, मारोती अण्णा मोहिते, सुरेश मगरे, बबलू माने, गजानन घोडके, नामदेव कळसाईतकर, प्रल्हाद कानडे, भोलानाथ जाधव, शिवा माने तसेच पंचायत समिती सदस्य ज्ञानोबा घोडके आदींसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे स्वतः उपस्थित होते व पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नमाज पठणानंतर विक्ष्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. तसेच पत्रकार सुरेश मगरे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांसाठी शरबत वाटपाचा उपक्रम राबवून ईद सणाचा आनंद द्विगुणित केला.






