पालम, दि. १४ : तालुक्यातील फरकंडा शिवारात रानडुकरांपासून उसाचे पीक वाचविण्यासाठी शेताभोवती लावलेल्या तारेला विजेचा प्रवाह सोडल्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी पालम पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरकंडा येथील महेबूब मदारसाब पठाण (वय ४०) यांनी रानडुकरांपासून उसाचे पीक सुरक्षित राहावे म्हणून शेताभोवती बांधलेल्या तारेला निष्काळजीपणे विजेचा प्रवाह सोडला होता. मात्र, तो वेळेवर बंद न केल्याने मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांची पत्नी आशाबी महेबूब पठाण (वय ३५) हिचा त्या तारेला स्पर्श झाला आणि तिला जोरदार विजेचा धक्का बसला.
पत्नीला वाचविण्यासाठी धावलेल्या महेबूब पठाण यांनाही विजेचा धक्का बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे फरकंडा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांनी अशा प्रकारे शेताभोवती विजेचा प्रवाह सोडणे किती धोकादायक ठरू शकते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
या प्रकरणी मदारसाब नन्हुसाब पठाण (वय ५५, रा. फरकंडा) यांच्या फिर्यादीवरून पालम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लोखंडे करीत आहेत











Total Users : 254687